Aajache Shikshan Udyache Jivan
Marathi
शाळांची शैक्षणिक भूमिका अशी असायला हवी की, सर्वच मुलांना सर्वच संधी घेता याव्यात, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याची त्या त्या बाबतीतील प्रगती होऊ द्यावी. सर्वांनाच विविधांगी कुशलता मिळू द्यावी. सर्वांनाच पुरेसा सर्वांगीण अनुभव आणि आनंद मिळावा. याऐवजी शाळा काही मोजक्या मुलांना ठराविक स्पर्धासाठी तयार करून आपल्या शाळेला विविध स्पर्धातील अधिकाधिक बक्षिसे प्राप्त करून इतर शाळांशी स्पर्धा करीत असते आणि या बक्षिसांचे प्रदर्शन करून आपला अहंगंड जोपासत असते.
या शाळाशाळातील अशा गैरवाजवी स्पर्धामुळेच शाळाशाळांमधून विषमता निर्माण होते आणि जी शाळा अभ्यासात आणि इतर गोष्टीमध्ये स्पर्धेत अधिक पुढे जाते तीच शाळा चांगली अशी पालकांची भावना बनते. वास्तविक अशी चांगली शाळा ही थोड्या मुंलांसाठी चांगली आणि अनेक मुलांसाठी चांगली नसलेली शाळा असते हे सत्य सहजपणे जाणवत नाही. त्यामुळेच अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक-मुलांची झुंबड उडते आणि मग प्रवेशापासूनच मुलांमध्ये स्पर्धेचे मानसिक ताण निर्माण व्हायला सुरवात होते.
✻